राज्यात वातावरण बदलतंय! काय आहे पुढील अंदाज?
29-07-2024

राज्यात वातावरण बदलतंय! काय आहे पुढील अंदाज?
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. तसेच तीन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला होता. या पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून पाझर, तलाव आणि छोटी धरणे भरले आहेत. मोठ्या धरणांच्या पाणी साठ्यात चांगली वाढ झाल्याने बळीराजाची चिंता मिटली आहे.
त्याबरोबर, अद्यापही राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती आहे.
तीन दिवसांपूर्वी पश्चिम घाटासह महाराष्ट्रात झालेल्या पावसानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. २५ जुलैनंतर राज्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जर पुढील पाच दिवसांच्या पर्जन्यमानाचा विचार केला तर कोकण, पश्चिम घाट परिसर व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. २९ जुलै ते १ ऑगस्ट या अंतराळामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमीच जाणवत आहे.
संपूर्ण मराठवाड्यात अजूनही चांगला पाऊस झाला नसल्याचं शेतकर्यांनी सांगितलं आहे. तर एकीकडे पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत असून दुसरीकडे त्याच जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पाझर तलावही भरले नसल्यामुळे पावसाचे असमान वितरण होत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पश्चिम घाटातील भात लागवड अजूनही बाकी आहे. त्याबरोबर राज्यातील बहुतांश शेतकर्यांनी एक रूपयांत पीक विमा या योजनेसाठी अर्ज भरला आहे.