मराठवाड्यात संततधार पाऊस, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा...
02-09-2024

मराठवाड्यात संततधार पाऊस, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा...
जवळपास दीड ते दोन आठवड्यांच्या उघडीनंतर आजपासून मराठवाड्यात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत.
यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांसाठी तसेच फुलोऱ्यात असलेल्या पिकासांठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे.
पण, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण गेले काही दोन ते तीन आठवड्यापूर्वी ४० टक्क्यांच्या आसपास होते.
या धरणाची पाणीपातळी आता ८५ टक्क्यांपर्यंत गेली असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच बीडमध्ये संततधार पावसामुळे बिंदुसरा प्रकल्प सुद्धा भरला आहे. तर इतर छोटेमोठे प्रकल्प या पावसामुळे शंभरीकडे वाटचाल करत आहेत.
हिंगोली शहरामध्ये रस्ते जलमय झाले असून जिल्ह्यातही सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, या जिल्ह्यांत आज सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे.
तसेच नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावारण असल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील पुसद येथील पुस नदीला पूर आल्यामुळे पुलावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.
तर नांदेड आणि तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे संपर्क तुटला होता. तर दुसरीकडे या पावसामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना आणि पिकांना फायदा होणार आहे.